Wednesday, 22 June 2016

अंधारातील प्रकाशकर्ती : हेलन केलर

   

         ज हेलन केलरचा जन्मदिवस . 27 जून 1880 रोजी अमेरिकेच्या आलबामा राज्यात तिचा जन्म झाला. आई केट(कथरीन) अडाम्स आणि वडील आर्थर केलर.  हेलन दोघी बहीणीतली मोठी . शिवाय तिला दोघे मोठे सावत्र भाऊही होते . तिच्या कुटुंबाची सांपत्तिक स्थिती काही फारशी चांगली नव्हती आणि केवळ कापसाच्या उत्पादनावर त्यांचा चरितार्थ चालत होता. प्रथम आर्मी मध्ये असणारे तिचे वडील नंतर एका साप्ताहिकाचे संपादक बनले .      
     तिच्यापेक्षा फक्त चौदा वर्षानी मोठी असलेली तिची अंध शिक्षिका अॅनी सुलीवान, हिने हेलनची या जगाशी ओळख करून दिली. कारण भाषेच्या अभावी ती कुणाशीही काहीच संवाद साधू शकत नव्हती. जन्मली तेव्हा हेलनला ऐकुही येत होत आणि दिसतही होत. पण ती साधारण दीड एक वर्षांची असताना तिला मॅनेंजायटीस सारखा आजार झाला आणि त्यामध्ये तिच्या या दोन्ही संवेदना नाहीशा झाल्या. ती खरतर सहा महिन्याची असताना बोलायला लागली आणि वर्षभराची मुलगी चालायलाही लागली होती.  हेलन त्यांच्या कुकची मुलगी, तिची बालमैत्रीण, मार्था वॉशिंग्टन हिच्याबरोबर काहीबाही संवाद साधत होती. त्या दोघींनी मिळून त्यांच्यापुरतीच खुणांची भाषा विकसित केली होती. त्या आधारे त्या एकमेकींशी संवाद साधत. हेलन या काळात खूप हिंसक होत असे. त्याच प्रमाणे जेव्हा आनंदाने खुश असे तेव्हाही तीच वागणं नियंत्रणा बाहेरच होत. या सगळ्याचा तिच्या मैत्रिणीला आणि आई वडिलांनाही त्रास होत असे. तिच्या नातेवाईकांना वाटायचं तिला सरळ कुठल्यातरी संस्थेत दाखल करावं .
       मुळातच बुद्धिमान असलेली हेलन लाडाने थोडी बिघडली होती. अॅनी सुलीव्हानने आल्यानंतर आठवडा भरातच हेलनच्या घरच्यांचा विश्वास संपादन केला. आणि मुख्य घरात न राहाता ती हेलनला घेऊन घराशेजारच्या आऊट हाऊस मधे दोन आठवडे राहीली. सुलीव्हान हिने प्रथम तिला एक बाहुली भेट दिली आणि डॉल म्हणून तिचा हेलनशी परिचय करून दिला. तेव्हा हेलन उद्विग्न झाली. हेलनला ती हातावर एक एक इंग्लिश अक्षर गिरवून शिकवत होती. डी ओ एल एल . अॅनीने हात पंप चालू करून त्या पाण्याखाली हेलनचा एक हात धरला आणि दुसर्‍या हाताने तिने ड्ब्ल्यु ए टी ई आर लिहिलं. म्हणजे हाताला थंडगार जाणवलेला स्पर्श म्हणजे वॉटर हे तिला कळलं. जेव्हा हातावरचा पाण्याचा स्पर्श तिला सुखावून गेला, तेव्हा रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी जाणून घ्यायला ती उत्सुक झाली. तीन प्रेमाने चुचकारत आणि आंजारून गोंजारून आज्ञा पालनाचे धडे देत शिस्त लावली.
       हेलनन लोकांशी होता होईल तितका संवाद साधून बोलायला सुरुवात केली. ती सुलीव्हान कडून ब्रेल मध्ये लिहायला आणि वाचायला शिकली. मूक बधिरांच्या खुणा ती स्पर्शातून जाणायला शिकली. तिचा बोलण्याचा प्रयत्न काहीसा असफल झाला. पण सार्वजनिक समारंभात ती दुभाषाच्या सहाय्याने आपल बोलणं लोकांपर्यंत पोचवू लागली. तरीही तीन जगासाठी एक शिक्षणतज्ञ ,एक कुशल संघटक म्हणून खूप मोठी कामगिरी केली. अवघ आयुष्य तिन यासाठी वेचल. लोकांचं बोलणं ती ऐकायची. त्यांच्या ओठांवर बोट ठेवून ,ओठांच्या हालचालींवरून ती शब्द जाणून घ्यायची. तिची स्पर्शाची संवेदना अत्यंत तीव्र होती. ब्रेल लिपीमधे ती पारंगत झाली आणि खुणांच्या भाषेमध्येही तेवढीच माहिर झाली. इतकच नव्हे तर टेबलवर हात ठेवला की, बोटांच्या पेरांच्या सहाय्यानं जवळपास कुठेही  वाजणारे संगीत ती अनुभवू शकत होती. तिची कथा आता सगळ्यांच्याच परिचयाची झाली होती. सर्वसामान्य जनतेपासून ते प्रसिद्ध साहित्यिक, कलाकारांपर्यंत सगळेच तिला ओळखत होते. तिने याचा योग्य फायदा उठवला. मार्क ट्वेन हा त्यापैकीच एक. हेलनच असामान्य कौशल्य आणि कुशाग्र बुद्धी आलेक्जांडर ग्रहाम बेल आणि मार्क ट्वेन यांनी ताडली होती. 19व्या शतकातील दोन असामान्य व्यक्ति म्हणजे नेपोलियन आणि हेलन अशा शब्दात मार्क ट्वेन याने तिचा गौरव केला होता.
         एक अंध, मुक बधिर मुलगी, तिन तीच जग कस पाहिलं असेल? आणि त्यातून सृजनाची निर्मिती करणे  म्हणजे मोठ जोखमीच काम ! तिन लिखाण केल. 1903 मधे तीच “स्टोरी ऑफ माय लाईफ” हे आत्मचरित्र प्रसिद्ध झालं. ते 50 भाषांमध्ये प्रसिद्ध झालं आहे. प्रथम ब्रेल टाइप रायटरवर टाइप करून नंतर ती साध्या टाइप रायटरवर टाइप करत असे. तिच्या पासपोर्टवरही तिचा व्यवसाय लेखिका म्हणून लिहिला होता. या टाइप रायटरवरच्या शब्दांच्या माध्यमातून तीन अमेरिकन लोकांशी आणि जगातल्या सर्व लोकांशी संवाद साधला. तीन तिच्या लिखाणातून सत्याचीच कास धरली. कामगारांच्या हक्कांसाठी आणि स्त्रीयांच्या शोषणा विरुद्ध हे हत्यार तीन वापरलं. ती स्त्रीयांसाठी लढा देणारी, कामगारांच्या हितासाठी प्रयत्न करणारी, कट्टर समाजवादी लेखिका होती.
       ती मोठ मोठ्या व्यक्तिमत्वांच्या सानिध्यात आली  आणि ते लोक तीचे अगदी जिवाभावाचे होऊन गेले. रूझवेल्ट, आइनस्टाईन, एमा गॉडमेन ,चार्ली चॅपलिन, हेन्री फोर्ड, जॉन केनेडी, जो डेव्हिडसन, आयसेनहोवर आणि असे बरेच. जगात सगळीकडे तिला मान मरातब मिळाला. अनेक सत्कार झाले. कित्येक पुरस्कार मिळाले. तिला हार्वर्ड युनिवर्सिटी, बर्लिन युनिव्हार्सिटी, दिल्ली युनिवर्सिटी, यांच्याकडून मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्या. 1955 मधे, स्वत: प्रेरणास्त्रोत असलेल्या फिल्मसाठी अकादमी अवॉर्ड मिळाले.
      १ जून १९६८ रोजी तिच्या वाढदिनाच्या काही दिवस आधी तिला मृत्यू आला. मृत्यूनंतर तिच्या सहकारी अॅनी सुलीव्हान आणि पॉली थौंप्सन यांच्या शेजारी तिला चिरनिद्रा देण्यात आली.
                             ……………………………………सविता नाबर 

published in Saptahik Sarvakal on 27th June 2016

To Be or Not To Be



       कदा एक धोबी त्याच्या मुलाला घेऊन त्याचे म्हातारे झालेले गाढव विकायला बाजारात चालला होता. मुलगा अर्थातच गाढवावर स्वार झालेला. रस्त्यात धोब्याचे मित्र भेटले, “काय मुलगा आहे! स्वत: गाढवावर बसून चालला आहे आणि वयस्क बाप बिचारा चालतोय” मुलाला हे ऐकून शरम वाटली. तो खाली उतरला. आता बाप गाढवावर बसला. काही अंतर गेल्यावर काही स्त्रियांनी हे दृश्य पाहिले ते म्हणाले, बरोबर गाढव असताना बिचारा मुलगा चालतोय. पुन्हा बाप लेकाने निर्णय बदलला. दोघेही गाढवावर आरुढ झाले. हे ज्या लोकांनी पाहिले ते म्हणाले, “दोघेही बिचार्‍या म्हातार्‍या प्राण्यावर बसलेत. त्यांना जरासुद्धा कशी दया माया नाही.” पुन्हा ते दोघे खाली उतरले आणि गाढवाचे पाय काठीने बांधले आणि त्याला उलटे टांगून दोघेजण खांद्यावर घेऊन निघाले. गाढवाचे ओझे वाहून ते इतके दमले की नदीच्या पूलावरून जाताना एका मोठ्या दगडाला ठेचकाळून पडले. गाढव पुलावरून पाण्यात कोसळले आणि त्याला जलसमाधी मिळाली. ही गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे.
    निर्णय घेताना स्वत:च्या परिस्थितीला अनुसरून घेतला पाहिजे. आपला निर्णय चुकेल म्हणून बरेच जण निर्णय लांबणीवर टाकत असतात. कामात अपयश येईल म्हणून निर्णय घेण्याचे टाळत असतात. जेव्हा निर्णय घ्यायचा तेव्हा आपले डोके शांत ठेवले पाहिजे. बुद्धी समतोल ठेवली पाहिजे. खूप लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून डोके फिरवून घेतात. समोरची व्यक्ति संतापली की जो आपले डोके शांत ठेवतो तो खरा शहाणा माणूस. तोच व्यवस्थित निर्णय घेऊ शकतो कारण अशावेळी त्याची बुद्धी समतोल रहाते. समतोल बुद्धीची कसोटी अडचणीच्या परिस्थितीत आणि संकटाच्या वेळी लागते. अशा माणसावर कितीही मोठ्या जबाबदारीचे काम सोपवले तरी तो काम पूर्ण करूनच दाखवतो. महत्वाचे निर्णय घेताना परतीचे दोर उघडे ठेवले म्हणजे फार नुकसान होत नाही. ज्याला एखाद्या प्रश्नांच्या दोन्ही बाजू बरोबर वाटू लागतात. त्याला कुठल्याच बाजूने निर्णय घेता येत नाही.  
       एका फांदीवर तीन पक्षी बसले आहेत. त्यातले दोघेजण फांदीवरून उडायचा विचार करतात. मग फांदीवर किती पक्षी राहातील? बरेच लोक म्हणतात एकच पक्षी राहील. काहीजण म्हणतात कुणीच असणार नाही. कारण ते दोन पक्षी उडल्यावर फांदीच्या हेलकाव्याने उरलेला पक्षीही उडून जाईल. पण तसे बघायला गेले तर यापैकी कोणतेच उत्तर खरे नाही. कारण जोपर्यंत मनाशी घेतलेला निर्णय प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत खरी काहीच हालचाल होत नाही. म्हणून दोन पक्षी नुसते ठरवतात, जोपर्यंत काहीच अॅक्शन घेत नाहीत तोपर्यंत काही घडत नाही. आपल्या आयुष्यातही असेच असते. आपण बर्‍याच गोष्टी मनात ठरवतो, हे करायचे आहे, ते करायचे आहे, पण अॅक्शन होत नाही. कारण निर्णय होत नसतो.
     आयआयएमला हा प्रश्न विचारला गेला होता. काही मुले रेल्वे ट्रॅकवर खेळत असतात. पैकी एक मुलगा ज्यावर गाडी येत नाही अशा वापरत नसलेल्या ट्रॅकवर खेळत असतो. आणि दहा बारा मुले, गाड्यांची नेहमी ये जा चालू असणार्‍या ट्रॅकवर खेळत असतात. लांबून रेल्वे येताना दिसते. सिग्नल तुमच्या हातात आहे. तुम्ही त्याक्षणी काय निर्णय घ्याल? जास्त मुले खेळणार्‍या मार्गावरून ट्रेनला जाऊ द्याल की एकच मुलगा खेळतोय त्या मार्गावर गाडी घ्यायला सांगाल? बरेच लोक जो ट्रॅक वापरात नाही त्यावर गाडी घायला सांगतील, कदाचित तुमचाही तोच निर्णय असेल. पण थोडासा विचार केलात तर लक्षात येईल, जी मुले वापरात असणार्‍या ट्रॅकवर खेळताहेत, त्यांना त्यावर गाडी येणार याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे ती मुले नक्कीच सावध असणार. ट्रेनचा हॉर्न ऐकताक्षणी ती बाजूला होणार. जो मुलगा पडक्या ट्रॅकवर खेळतोय, त्यावर ट्रेन नक्कीच येणार नाही ही त्याला खात्री आहे. तार्किक दृष्ट्या तो बरोबर आहे. समजा तुम्ही तो खेळत असलेल्या मार्गावर गाडी घेतली तर त्या मुलाचा मृत्यू ठरलेलाच आहे. शिवाय, तो ट्रॅक नदुरुस्त असल्याने त्यावरून गाडी घेतली तर ती सरळ जाणार नाही. अपघात होऊन गाडीतल्या माणसांच्या जीवाला धोका आहे. म्हणजे फक्त दहा बारा जणांचा जीव वाचवताना बाकीच्या शेकडो लोकांना तुम्ही मृत्युच्या दावणीला बांधत आहात. अशा प्रकारचे त्वरित निर्णय घेण्याची वेळ आपल्यावर बर्‍याच वेळा येत असते आणि आपण दग्ध्यात पडत असतो. अशावेळी थोडा विचार करून निर्णय घ्यावा लागतो.
     निर्णय घेता न येणे म्हणजे जे परिणाम होतील त्याला तोंड देण्याची तयारी नसणे. जे नुकसान सोसावे लागणार त्याला मानसिक तयारी नसते. म्हणून अशा लोकांना निश्चित निर्णय घेता येत नाही. इंग्रजीत एक म्हण आहे. One can not have a cake and eat it also. कोणताही निर्णय घेताना दुसर्‍या एखाद्या गोष्टीची त्याग करण्याची तयारी पाहिजे. प्रश्न लोंबकळत ठेवण्यापेक्षा त्याचा लगेच निकाल लावणे आवश्यक असते.
       .............................सविता नाबर 


Published in Maharashtra Times on 22nd June 2016 in Kolhapur Times





Wednesday, 15 June 2016

मरणात खरोखर जग जगते

   

          रियर म्हणा, सुख म्हणा, आनंद म्हणा, भविष्य म्हणा सगळ्याची फलनिष्पत्ती एकच. पैसा! कुणी सरधोपट मार्गाने मिळवतो तर कुणी उंगली टेढी करून, झटपट वाम मार्गाने मिळवतो. पण याहूनही सर्वश्रेष्ठ सुख जगात आहे याची आपल्याला कल्पनाच नसते. यावरून एक गोष्ट आठवली. एकदा एक गरीब माणूस देवाकडे गेला आणि त्याने त्याच्याकडे धनाची मागणी केली. कारण तुम्हा आम्हाला माहीत आहे. पैसा हे आपले अंतिम ध्येय. “मला सुखी कर माझ्याकडे पुरेसा पैसा नाही म्हणून मी सुखी नाही. मला मुला लेकराना चांगले चुंगले खायला घालून मोठे करायचे आहे.” देव म्हणाला “ठीक आहे. एक लाख रुपये देतो, तुझा एक हात मला दे. दोन लाख देतो, तुझा एका हात आणि एक पाय मला दे. आणखी एक लाख देतो तुझा एक डोळा मला दे.” असे करत वीस पंचवीस लाखात त्याचा अवघा देह विकला गेला. गरीब माणसाने आता विचार केला पैसा मिळणार असेल तरी त्या बदल्यात आपला देह जाणार. त्याने देवाची क्षमा मागितली. मी काहीही कुरकुर करणार नाही. पण माझा देह धडधाकट ठेव. मी कष्ट करायला तयार आहे. देव म्हणाला, “आता कळले सुख म्हणजे काय ते? दृष्टीसुख, रुचि,गंध, स्पर्श यांचे सुख काय हे तुला कळले असेलच, पण काम करण्याचे, हाती पायी धड असण्याचेही केवढे सुख आहे हेही तुला लक्षात आले असेल.” जेव्हा आपली पंचेंद्रिये शाबूत असतात तेव्हा आपल्याला त्या अवयवांचे महत्व कळत नाही. हातपाय धड असताना चालण्यातले सुख म्हणजे काय हे उमगत नाही. आल्हाददायक रंगांची दुनिया आपण पहात असताना नेत्रहीनांच्या दुनियेतला अंधार आपल्याला जाणवत नाही. 
     शाळकरी वयात एक पुस्तक वाचले होते त्याचे नाव होते कोमा. मूळ लेखक रॉबिन कुक याच्या पुस्तकाचा रवींद्र गुर्जर यांनी अनुवाद केला होता. एखादी व्यक्ति आजारी झाली की तिची तब्बेत आणखी ढासळवून शेवटच्या पंथाला लावायची. आणि सरतेशेवटी, त्या व्यक्तीचे जितके अवयव वापरता येतील तेवढे काढून गरजूंना विकायचे. त्यावेळी अवयव विकणे हेच काहीतरी विचित्र वाटत होते. पण शास्त्र जसे प्रगत झाले तसे मानवी अवयव हेसुद्धा इतर वस्तूसारखेच विकाऊ आहेत हे कळायला लागले. मानवी अवयव जर उपयोगी पडतात तर मृत्यूनंतर त्यांचा उपयोग का करू नये? आता हळू हळू ही अवयव दानाची संकल्पना पुढे येते आहे, रुजते आहे.
       धाकटय़ा भावाच्या अपघाती मृत्यूनंतर अवयव दानाचे महत्त्व भिवंडी येथील विनोद शेटे यांच्या लक्षात आले. उपचारा अभावी तसेच योग्यवेळी अवयव उपलब्ध न झाल्याने अनेकांना प्राण गमावावा लागतो. यावर ठोस उपाय योजनांची गरज आहे. याची सुरुवात आपल्यापासून करण्यासाठी त्यांनी कुटुंबीयांपुढे अवयव दानाची संकल्पना मांडली. त्याला कुटुंबातील सदस्यांनीही सकारात्मक पाठिंबा दिला. त्यामुळे स्वत:चा वाढदिवस आणि जागतिक नेत्रदान दिनाचे निमित्त साधून शेटे आणि कुटुंबातील २४ सदस्यांनी नेत्रदान करत या संकल्पनेची सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबातील अगदी छोट्या मुलापासून ते 75 वर्षांच्या आजोबांनी सुद्धा नेत्रदान केले. आपला वाढदिवस दणक्यात  साजरा करण्यासाठी नाच, गाण्यावर थिरकत पैशांची उधळपट्टी करणारे अनेक जण आपल्या आजूबाजूला आढळतील. वाढदिवस आणि जागतिक नेत्रदान दिनाचे निमित्त साधून शेटे यांनी कुटुंबातील २४ सदस्यांसह एकत्रितपणे नेत्रदान करून एक आदर्श निर्माण केला आहे. समाजातील अंध व्यक्तींना नव्याने आयुष्य जगता यावे, यासाठी हा संकल्प केल्याचे त्यांनी सांगितले. अवयव दानाचाही संकल्प असून, त्याची सुरुवात नेत्रदानापासून करण्याचा एकत्रित निर्णय  घेतला आहे. या उपक्रमात आता कुटुंबीयांतील आणखी १० सदस्य सहभागी झाले असून, मित्र परिवारालादेखील त्यांनी अवयव दानाचे महत्त्व पटवून दिले. माणसाच्या आयुष्यातली, जन्म आणि मृत्यू ही दोनच ढळढळीत सत्य. जन्माचा सोहळा आनंदाने साजरा होतो. ऐपत नसली तरीही. मृत्युला मात्र गंभीरतेची सजा. उदासीनतेची छटा. किंबहुना मरण कुणालाच न रुचणारे. स्वत:च्या दु:खात चूर असताना दुसर्‍याच्या भल्याचा विचार डोक्यातही येत नाही. अशा वेळी शेटेंसारखे लोक समाजापुढे आदर्श घालून देतात.
    आपल्या पश्चात आपले दोन डोळे दोन व्यक्तींना दृष्टीदान देऊ शकतात. संकल्प अनेक लोक करतात. पण संकल्प आणि प्रत्यक्ष नेत्रदान यामध्ये बरेच अंतर आहे. अस म्हणतात की मृत्यूनंतर शरीराची जेव्हा राख बनते तेव्हा डोळेही त्यामध्ये भस्मसात होतात. मग हाच अत्यंत उपयोगी अवयव बेचिराख होण्यापेक्षा दुसर्‍या कुणाच्या सत्कारणी लागला तर! तेही एकाच वेळी तुम्ही दोन व्यक्तींना डोळे देऊन उपयोगी पडू शकता. तुमच्या डोळ्यांना आणखी काही वर्ष जीवदान मिळते आणि दृष्टी रुपानं सृष्टीचे रूप पाहायला सज्ज होऊ शकता. आधुनिक तंत्रज्ञानामुळे मृत व्यक्तीचे डोळे, नेत्रहीन व्यक्तिला बसवण्यासाठी चोवीस तासच नाही तर चार दिवसांपर्यंतच्या मुदतीत ते बसवू शकतात. खरेतर ग्रामीण भागात सामाजिक चळवळ फार मोठ्या प्रमाणावर नसते. पण आज अत्याळ सारखं छोट गाव नेत्रदानामधे सर्वात पुढे आहे. किती सुसंस्कृत, पुढारलेले आहेत त्या गावाचे लोक अस म्हणावस वाटत. लोकांमध्ये इतकी जन जागृती झाली आहे की कुणाच्याही घरी मृत्यू झाला की कार्यकर्त्यांना बोलावले जाते. डॉक्टरांना फोन होतो. नेत्र काढून नेत्र पेढीत पाठवले जातात. अशीच चळवळ आता जवळपासच्या तीन चार गावात बेळगुंदी, कौलगे, करंबळी इथे चालू झाली आहे. गडहिंग्लजला देहदानाची चळवळ चालू झाली आहे.
    मृत्युच्या पश्चात एक देह सात जणांचे आयुष्य बदलू शकतो. अजूनही आपल्याकडे अवयवदाना विषयी म्हणावी तितकी जन जागृती नाही. कितीतरी लोक त्याच्या प्रतीक्षेत आहेत. विदर्भात माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या पुढाकाराने चंद्रपुर येथे अवयव दान यावर एक हृद्य कार्यक्रम झाला. पुगालिया यांनी स्वत;च्या वाढदिनी अवयव दानाचा संकल्प केलाच पण त्यांच्या बरोबर 113 जणांनी असा संकल्प केला. मृत्यूनंतर नेत्रदान, त्वचादान, हाडे, हृदय, यकृत, फुफ्फुसे, स्वादूपिंड यांचे दान गरजू व्यक्तिला, ज्यांच्या शरीरातील हे अवयव निकामी झाले आहेत अशांना करता येते. त्यांना जीवनदान मिळते. आपल्याकडे अशा गरजू व्यक्ति हजारोंनी वाट पाहत आहेत. आपला देह मृत्यूनंतर वाया जाऊ देण्यापेक्षा जर तो दुसर्‍या कुणाच्या उपयोगी पडला तर !
                ................................ सविता नाबर 

Published in Saptahik Sarvkal on 13th June 2016

बोल बोल म्हणता.....

           

      का व्यक्तीच्या मनातल्या भावना दुसर्‍यापर्यंत पोचण्यासाठी संभाषण उपयुक्त ठरते. कधीकधी देहबोलीतूनही व्यक्त होता येते. संभाषण म्हणजे निव्वळ बोलणे नव्हे. मनातले विचार समोरच्याला कळायला हवेत. दुसर्‍याच्या मनातले विचार जाणून त्याप्रमाणे आपले आचरण करणे म्हणजे communication. संभाषण किंवा संवाद हा त्याचा एक प्रकार. संवादाचे किती प्रकार आपण अनुभवत असतो. घरात आणि घराबाहेर. फोन, मोबाईलवर, मुले आणि पालक, पति पत्नी, मित्र मैत्रिणीमधला, मालक नोकरातला, कार्यालयातील सहकार्‍यातला, भावनांच्या असंख्य छटा दाखवणारे संवाद. बोलणे आणि ऐकणे यांची सुंदरशी गुंफण म्हणजे संवाद.
     चेहर्‍याला एक तोंड, दोन कान का असतात? म्हणजे जेवढे बोलाल त्याच्या दुप्पट ऐकले पाहिजे. प्रत्येकवेळी बोलणे म्हणजे संवाद नव्हे. कधीतरी ऐकून घेणे म्हणजेसुद्धा सांगणार्‍याला दिलेला प्रतिसाद असतो. समोरच्या व्यक्तीच्या शब्दांना स्पर्श करणे, त्यांना सर्व बाजूंनी पहाणे, शब्दातील भावनांचा गंध, आस्वाद घेणे, म्हणजे श्रवण. इयत्ता पहिली किंवा दुसरीतला धडा मला आठवतो. एकदा देवाने सशाला संगितले नारद बसले आहेत बागेत. जा त्यांना बोलावून आण. सशाने ऐकले नारळ पडले आहेत बागेत. ससा बागेत गेला पाहतो तो काय नारळ तर उंचच उंच झाडावर. त्यावर आपण कसे चढणार आणि देवांना नारळ कसा देणार म्हणून विचारात पडला बिचारा. बराच वेळ झाला तरी सशाचा पत्ता नाही. देवाने पाहिले, ससा आपला विचारात गढलेला. काय घडले हे देवाला कळले तेव्हा देवाने सशाला म्हटले, थांब तू नीट ऐकत नाहीस ना, तुझे कान आता लांब करतो. म्हणून सशाचे कान देवाने ओढून लांब केले. कथा जरी बालांसाठी असली तरी त्याचा गर्भितार्थ आपण मोठ्यांनी उचलायला हरकत नाही. कारण लहानपणी गोष्टीचा तथ्यांश हा तिच्या बाह्यरुपातच पाहतो. पण आपण जरा कळण्याच्या वयातले झालो की त्या रूपकापाठीमागचा हा दडलेला अर्थ कळतो. हा झाला व्यवस्थित न ऐकण्याचा परिणाम. आजच्या घडीला हे संभाषणात कमी पडल्याचा परिणाम म्हणता येईल.
        संभाषण परिचित व्यक्तीबरोबर होते आणि अनोळखी माणसाबरोबरही होते. आपल्याला जे पूर्वीपासून ओळखत नाहीत त्यांचे आपल्याविषयी चांगले मत व्हावे असे वाटत असेल तर ही एकच गोष्ट उपयोगी पडते. आकर्षक कसे बोलावे हे प्रयत्नपूर्वक शिकावे लागते. आपले विचार आणि मते कशी मांडायची याविषयी आधी योजना करून फार कमी लोक बोलतात. त्या क्षणी जे शब्द सुचतात ते बोलतात. आपल्या बोलण्यात सौन्दर्य असणारे, पाल्हाळ नसेलेले, पारदर्शक असेल असे संभाषण हवे. उत्तम संभाषण कला असलेल्या लोकांचे बोलणे आपण ऐकले तर आपल्या बोलण्यातही तशीच खुबी हळूहळू येते.
    संभाषण करण्याचा महत्वाचा नियम म्हणजे जरुरीपेक्षा जास्त बोलू नये. संभाषण जितके लांबेल तितका त्याचा प्रभाव कमी होतो. कारण लोकांना बडबडीचा कंटाळा येतो. संभाषणात कोणालाही दोनपैकी एक भूमिका करावी लागते. एक तर स्वत: बोलावे लागते किंवा दुसर्‍याचे ऐकावे लागते. जसे उत्तम बोलणारे कमी असतात तसेच उत्तम श्रवण भक्ति करणारेही कमी असतात. आपण त्याच्या बोलण्यात रस घेत आहोत असे त्याला वाटले पाहिजे. समोरच्या माणसाला पुर्णपणे बोलू द्यावे आणि बोलणे संपल्यावर प्रश्न विचारावा. तो बोलत असताना मधेच शंका काढून प्रश्न विचारू नये. त्याचे बोलणे तोडू नये.
    संभाषणात येणारा व्यत्यय हा बाहेरील गोंगाट, आवाज यामुळे असू शकतो किंवा जर आपले समोरच्याच्या बोलण्याकडे नीट लक्ष नसेल तर, किंवा संभाषणाच्या बाबतीत आपले मन जर खुले नसेल तर बोलण्याचा गर्भितार्थ कानातून आतपर्यंत पोचू शकत नाही. कधी मन उगाचच पूर्वग्रह दूषित असते, त्यामुळे संभाषणाचा योग्य परिणाम होत नाही. एका पतिराजांना आपल्या पत्नीच्या ऐकायला येण्याविषयी शंका असते. हे नवरोजी बायकोला प्रथम दुसर्‍या खोलीतून आज जेवायला काय म्हणून विचारतात. काही प्रतिसाद नाही म्हणून थोडे जवळ जाऊन आज जेवायला काय करणार आहेस म्हणून विचारतात, पुन्हा प्रतिसाद थंडच. पुन्हा थोडे जवळ जाऊन अगदी सहा फुटावरून तोच प्रश्न विचारतात. प्रतिसाद शून्यच. तिच्या अगदी मागे राहून तोच प्रश्न विचारल्यावर पत्नी वैतागून मोठ्या आवाजात उत्तरते, तुमच्या चौथ्यान्दा विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे, बिर्याणी. नवरा अचंभीत !! (म्हणजे बहिरे कोण?)
     बोलण्यापेक्षा ऐकणे अवघड. ऐकण्यालाही 3 अर्थ आहेत. To hear , to listen, to obey उत्तम श्रोता हा फक्त तुम्ही बोलता तेवढे ऐकत नाही तर तुम्ही न बोललेल, अर्धवट बोललेल, बोलू न शकलेलही कौशल्याने समजून घेतो. Between the lines सारखे बिटविन द words समजून घेतो. नुसते कानांनी नाही तर डोळ्यांनीही ऐकायला शिकले पाहिजे. पुस्तक वाचताना प्रत्येक शब्दाचा मनाशी संवाद घडत असतो. डोळ्याने वाचत असलो तरी शब्द मनाशी बोलत असतो.
   अत्यंत प्रभावशाली कम्युनिकेशनचे एक उदाहरण सांगते. एकदा एक नेत्रहीन मुलगा बागेतील पायरीवर बसलेला असतो. जवळच एका पाटीवर लिहिलेले असते “मी अंध आहे, मला मदत करा.” त्याच्या जवळच्या एका भांड्यात काही नाणी पडलेली असतात. एक माणूस ते पहातो आणि एक क्लृप्ती लढवतो. त्या लिहीलेल्या संदेशात बदल करतो, “आजचा दिन कैसा सुंदर, परंतु असे मम नयनी अंधार ” त्याचे भांडे नाण्यांनी भरून जाते. दोन्ही वाक्यांमधला अर्थ एकच. तो मुलगा अंध आहे. त्याला सहानुभूती मिळणारच. पण दुसर्‍या वाक्यातल्या संदेशाने लोकांच्या हृदयाला हात घातला आहे. बाकीचे लोक किती भाग्यशाली आहेत जे त्या मुलासारखे अंध नाहीत. संभाषणातून संवाद साधण्यासाठी वेळोवेळी अशा सर्जनशीलतेचीही गरज असते.  
              ...................सविता नाबर 
Published in Maharashtra Times, Kolhapur edition on 8th June 2016